लखनौ
अयोध्येतील राम मंदिरात २२ जानेवारी प्रभू श्री रामांच्या प्राणप्रतिष्ठेचा सोहळा व पूजनाचा भव्य कार्यक्रम होणार आहे. अयोध्येतील प्रभू श्रीरामाच्या मूर्तीचा अभिषेक झाल्यानंतर मंगळवारी २३ जानेवारीपासून हे मंदिर लोकांना दर्शनासाठी खुले होणार आहे. या सोहळ्यासाठी देशातील अनेक मान्यवरांना निमंत्रित करण्यात आले आहे. यासह भक्तांचीही मोठ्या प्रमाणात गर्दी होण्याची अपेक्षा आहे. भारतीय रेल्वे भक्तांसाठी देशाच्या विविध भागातून १००० हून अधिक विशेष गाड्या चालवण्याची योजना आखत आहे. या गाड्यांचे संचालन १९ जानेवारीपासून सुरू होईल आणि भव्य उद्घाटनानंतर पुढील १०० दिवस चालेल, जेणेकरुन भाविकांना पवित्र नगरीमध्ये प्रवास करता येईल.
या विशेष गाड्या दिल्ली, मुंबई, चेन्नई, बेंगळुरू, पुणे, कोलकाता, नागपूर, लखनौ आणि जम्मू या प्रमुख शहरांमधून यात्रेकरूंसाठी अयोध्येकडे धावतील. प्रवाशांची संख्या लक्षात घेऊन गाड्यांची संख्या वाढविण्यात येईल, असेदेखील भारतीय रेल्वेने स्पष्ट केले आहे. अयोध्येत मोठ्या संख्येने पायी येणा-जाणाऱ्यांची सोय करण्यासाठी रेल्वे प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. तसेच अयोध्या स्थानकालाही नवीन स्वरूप देण्यात आले आहे. विशेष गाड्यांव्यतिरिक्त, उद्घाटनाच्या १०-१५ दिवसांमध्ये यात्रेकरूंना चोवीस तास सेवा देण्यासाठी रेल्वेचा खानपान आणि तिकीट विभागदेखील सज्ज आहे. राम मंदिराच्या उद्घाटनानंतर भाविकांची मागणी पूर्ण करण्यासाठी अनेक खाद्यपदार्थांचे स्टॉल उभारण्याचीही अधिकाऱ्यांची योजना आहे.