श्रीनगर- जम्मू- काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यात १७०० वर्षे जुन्या असलेल्या प्रसिद्ध सूर्यमंदिराच्या आवारातील राम मंदिरात अयोध्येतील कलशाची स्थापना करण्यात आली. देशातील निवडक राम मंदिरासाठी पाठविलेला हा कलश असून उत्तरप्रदेश आणि तामिळनाडूतील भाविकांच्या उपस्थितीत या कलशाची स्थापना करण्यात आली.
कलश स्थापनेवेळी विशेष पूजा करण्यात आली. त्यानंतर भाविकांनी दर्शन घेतले. या राम मंदिरात कलश स्थापन केल्यानंतर एका स्थानिक भक्ताने सांगितले की, ‘या सन्मानाबद्दल आम्ही देशातील जनतेचे आभार व्यक्त करतो. काश्मीरमध्ये शांतता आणि सौहार्द नांदो अशी प्रार्थनाही करतो.’ अनंतनाग जिल्ह्यातील हे मार्तंड सूर्यमंदिर देशातील सर्वांत जुने मंदिर मानले जाते. १७०० वर्षे जुने हे मंदिर आहे पण सध्या त्याचे केवळ अवशेष शिल्लक आहेत. बाबराने जसे मंदिर पाडून मशीद बांधली होती. त्याचप्रमाणे सातव्या- आठव्या शतकात मुघलांनी हे मंदिर नष्ट करण्याचा प्रयत्न केला होता.भारतात ओडिशा, गुजरात, राजस्थान आणि काश्मीरमध्ये अशी चार सूर्यमंदिरे आहेत.