मुंबई
अलिबागचे नाव बदलून मायनाक नगरी असे करावे. तसेच अलिबागमध्ये मायनाक भंडारी यांचे भव्य स्मारक उभारण्यात यावे, अशी मागणी विधानसभा अध्यक्ष अॅड. राहुल नार्वेकर यांनी केली आहे. याबाबत त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्रदेखील दिले आहे. मात्र, नार्वेकरांच्या या मागणीला अलिबागमधील नागरिकांनी विरोध केला आहे.
अखिल भारतीय भंडारी महासंघाचे अध्यक्ष नविनचंद्र बांदिवडेकर, मुख्य सचिव प्रकाश कांबळी, सह सचिव वैभव तारी आणि प्रवक्ते शशांक पाटकर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने राहुल नार्वेकरांची भेट घेतली होती. यावेळी त्यांनी अलिबागचे नाव बदलण्याची मागणी नार्वेकरांकडे केली. नार्वेकरांनी पत्रात म्हटले आहे की, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या हिंदवी स्वराज्याच्या उभारणीत सागरी संरक्षण आणि सागरी मोहिमांना अतिशय महत्त्व आहे. कोकणातील भंडारी समाजाचे नेतृत्व करणारे मायनाक भंडारी या शूर लढवय्याकडे त्यांनी सागरी सीमेचे संरक्षण करण्याची जबाबदारी सोपवली होती. अलिबाग येथील खांदेरी-उंदेरी बंदरावरील किल्ला आणि तेथील मायनाक भंडारी यांचा पराक्रम, चिवट संघर्ष यापुढे इंग्रजांनादेखील माघार घ्यावी लागली होती. अखिल भारतीय भंडारी महासंघाचे अध्यक्ष नविनचंद्र बांदिवडेकर, मुख्य सचिव प्रकाश कांबळी, सहसचिव वैभव तारी आणि प्रवक्ते शशांक पाटकर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने माझी भेट घेऊन अलिबाग शहरासह तालुक्याचे “मायनाक नगरी” असे नामकरण करण्यात यावे तसेच मायनाक भंडारी यांचे अलिबाग शहरात भव्य स्मारक उभारण्यात यावे, अशी मागणी केली आहे. तरी, उपरोक्त मागणीची उचित दखल घेण्यात यावी आणि नामकरण, स्मारक उभारणी याद्वारे या मागणीची पूर्तता व्हावी.
अलिबागचे नामांतर करण्याच्या मागणीला अलिबागमधील कान्होजी राजे आंग्रे यांच्या वंशजांनी विरोध केला आहे. त्यांनी म्हटले आहे की, अलिबागच्या नावाला ऐतिहासिक महत्व आहे. त्यामुळे हे नाव बदलण्याची गरज नाही. कोणाची हे नाव बदलायची मागणी असेल तर सरखेल कान्होजी राजे आंग्रे यांच्या नावाचा विचार प्राधान्याने व्हायला हवा. मायनाक भंडारी यांचे कर्तृत्व आहे यात शंका नाही. पण म्हणून अलिबागला त्यांचे नावे देणे उचित होणार नाही. निवडणुकीच्या तोंडावर एखाद्या समाजाला खूश करण्यासाठी अशा मागण्या करणे चुकीचे आहे.