नंदुरबार –
नंदुरबार जिल्ह्यात गेल्या ६ दिवसांपासून अवकाळी पावसाचा कहर सुरुच होता. त्यामुळे काढणीसाठी आलेली पपई आणि केळी जमीनदोस्त झाली, तर कापूस, मिरची, कापणी केलेला भात आणि गुरांसाठी असलेला चाराही अवकाळी पावसामुळे वाहून गेला. त्यामुळे सरकारने पंचनामे न करता सरसकट मदत द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली.
शहादा तालुक्यातील काकर्दे दिगर, काकर्दे खुर्द, हिंगणी, तोरखेडा, अभणपूर, खापरखेडा, कोंढावळ परिसरात आठवड्यात तिसऱ्यांदा अर्धा तास पाऊस झाला. त्यामुळे शेतकऱ्यांच्या शेकडो एकरातील फळबागा केळी, पपई अक्षरशः आडवी झाली. झाडांवरील फळे जमिनीवर पडून लाखो रुपयांचे नुकसान झाले. तर डांगरमळे, हरभरा, भाजीपाला आदीसह शेती पिकाला मोठ्या प्रमाणावर फटका बसला आहे. आधीच्या दुष्काळाने आणि आताच्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले. कृषी आणि महसूल विभागाने सरकारने पंचनामे न करता सरसकट मदत द्या, मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. सरकारने नुकसानग्रस्त भागात पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले. मात्र, दररोज होणाऱ्या पावसामुळे नुकसानीच्या क्षेत्र वाढत असल्याने पंचनाम्यांना वेळ लागत असल्याचे प्रशासनातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी सांगितले आहे.