चेन्नई –
बंगालच्या उपसागरातून 2 डिसेंबर रोजी उद्भवलेले चक्रीवादळ मिचाँग आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीवर आदळल्यानंतर उत्तरेकडे सरकले आहे. हवामान खात्याने (IMD) दिलेल्या माहितीनुसार, हे चक्रीवादळ तेलंगणात पोहोचताच कमकुवत झाले.
वादळ 5 डिसेंबर रोजी दुपारी 1 वाजता नेल्लोर-मछलीपट्टनम दरम्यान बापटला येथे धडकले. यावेळी ताशी 100 किलोमीटर वेगाने वारे वाहत जोरदार पाऊस झाला. या वादळाचा सर्वाधिक परिणाम आंध्र प्रदेश आणि तामिळनाडूमध्ये झाला. दोन्ही राज्यांमध्ये 100 हून अधिक ट्रेन आणि 50 हून अधिक उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. 29 एनडीआरएफ आणि एसडीआरएफ टीमने आंध्र प्रदेशच्या किनारपट्टी भागातून 9500 लोकांना सुरक्षित स्थळी हलवले.आंध्र प्रदेशच्या सीएम कार्यालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, मिचाँगमुळे 194 गावे आणि दोन शहरांतील सुमारे 40 लाख लोक प्रभावित झाले आहेत. 25 गावात पूर आला. तामिळनाडूच्या मुख्य सचिवांनी सांगितले की, वादळामुळे राज्यात 2 दिवसांत 3 महिन्यांचा पाऊस पडला. चेन्नई शहर पाण्यात बुडाले असून त्यामुळे १७ जणांचा मृत्यू झाला आहे.