हैदराबाद – देशातील पाच राज्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीत यशस्वी कामगिरी केलेला भाजपा आंध्र प्रदेशात मात्र आगामी लोकसभा निवडणुकीसाठी युतीच्या प्रश्नावरून द्विधा मनस्थितीत दिसत आहे. तेलगु देसम भाजपशी युती करण्यास उत्सुक आहे, तर सत्ताधारी वायएसआर पक्ष स्वतंत्र लढण्याची भाषा करत आहे.
सत्ताधारी वायएसआर हा अल्पसंख्याक आणि ख्रिश्चनांच्या मतांवर मजबुतपणे उभा आहे. त्यामुळे या पक्षाला भाजपबरोबर जाणे उचित नसल्याचे या पक्षाच्या अनेक नेत्यांचे मत आहे.मात्र दुसरीकडे याच पक्षाने संसदेत अनेक मुद्द्यांवर मोदी सरकारला साथ दिली आहे. भाजप नेतृत्वाने सुद्धा वायएसआरचे प्रमुख नेते मुख्यमंत्री वाय एस जगन मोहन रेड्डी यांच्याशी चांगले संबंध ठेवले आहेत. त्याचप्रमाणे या राज्यातील दुसरा मोठा पक्ष म्हणजे तेलगु देसमसुद्धा भाजपशी उघड युती करण्याच्या बाजूने आहे.त्यामुळे भाजपची मात्र द्विधा मनस्थिती झाली आहे. नेमकी युती कुणाशी करायची असा प्रश्न भाजपसमोर उभा राहिला आहे.