आचरा समुद्रात बोट बुडाली! तीन मच्छीमारांचा मृत्यू

आचरा – मालवण तालुक्यातील आचरा येथील समुद्रात नारळी पौर्णिमा उत्सवाच्या दिवशी आज पहाटे बोट खडकाला आदळल्याने तीन मच्छीमारांचा मृत्यू झाला. तर एक जण बचावला. या घटनेमुळे मालवणात हळहळ व्यक्त होत आहे. आचरा येथील समुद्रात मासेमारी करण्यासाठी गेलेली सर्जेकोट येथील बोट दाट धुक्यामुळे एका मोठ्या खडकाला आदळली. त्यामुळे बोट समुद्रात बुडाली. या बोटीवर एकूण चार जण होते. त्यातील बोट मालकासह अन्य दोघे समुद्रात बुडाले, या बोटीवरील एक खलाशी पोहून समुद्र किनाऱ्यावर आला. त्याने ही घटना गावात सांगितली. समुद्रात अडकलेल्या तिघांच्या मदतीसाठी ग्रामस्थांनी समुद्रात धाव घेतली. मात्र, तोपर्यंत या तिघांचा मृत्यू झाला होता.