सातारा-जिल्ह्यातील जावळी तालुक्यात काही वर्षांपूर्वी विक्रमी पावसाची नोंद व्हायची.पण यंदा या तालुक्यात अत्यल्प पाऊस पडल्याने दुष्काळाचे सावट घोंगावत आहे. या तालुक्याच्या आजूबाजूला चार धरणे आहेत.तरीही हिवाळ्यातच जावळीकरांना पाणीटंचाईने हैराण केले आहे.
जावळी तालुक्याच्या आजुबाजुला कोयना,कण्हेर,महू आणि हातगेघर ही चार धरणे आहेत.या धरणांमुळे जावळी परिसरातील अनेकांना विस्थापित व्हावे लागले आहे. मात्र, जावळी तालुक्यांतील लोकांना काही या धरणांचे पाणी वापरता आलेले नाही.यंदा या तालुक्यात पाऊस झाला नसल्याने रब्बीच्या पेरण्या अद्याप झालेल्या नाहीत.तसेच या हंगामातही होणार नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांना अन्न आणि चाऱ्याचा प्रश्न सतावू लागला आहे.या तालुक्यातील कुडाळ विभागातील महू आणि हातगेघर धरणाचे काम गेल्या २५ वर्षापासून रखडले आहे.या तालुक्यातील सरताळे पाझर तलावही कोरडा पडला आहे.