आता कारागृहात मिळणार कांदा-लसूण विरहित जेवण

मुंबई – कारागृहातील कैद्यांसाठी वेगवेगळ्या उपाययोजना राबवल्या जात असताना आता त्यांच्या आहारात कांदा व लसणाशिवाय जेवणाचाही समावेश करण्यात आला आहे. कारागृह विभागाने याबाबत परिपत्रक जारी करत सर्व कारागृहांत हे आदेश लागू केले आहे.

कारागृह विभागाच्यावतीने सांगण्यात आले की,कारागृह विभागात सुरक्षा व सुव्यवस्थेचा आढावा घेण्यासाठी १० ऑक्टोबर रोजी अपर पोलिस महासंचालक व महानिरीक्षक अमिताभ गुप्ता यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. त्यात कैद्यांना येणाऱ्या अडचणींबाबत चर्चा झाली. तसेच अमिताभ गुप्ता यांना कारागृह भेटीच्यावेळी मुंबई मध्यवर्ती कारागृहातील काही कैद्यांनी धार्मिक व आरोग्याच्या कारणास्तव स्वयंपाक करताना त्यात कांदा व लसूण याचा वापर करू नये अशी विनंती केली. याबाबत आढावा बैठकीत चर्चा झाली. त्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.

ज्या कारागृह संस्थांना कारागृहात कैद्यांसाठी आहार तयार करताना साधनसुविधा व कारागृह सुरक्षिततेचा विचार करून सहज शक्य होत असेल, तर कांदा व लसूण न वापरता जेवण देण्याबाबत सकारात्मक निर्णय घेण्यात आला आहे. कैद्यांच्या विनंतीनुसार, जे बंदी कांदा व लसूण यांचा वापर न करता तसेच कमी तिखट असलेल्या भाजीची मागणी करत आहेत, अशा कैद्यांना त्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने वेगळी भाजी बनवून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top