इयत्ता ५ वी, ८ वी साठी वार्षिक परीक्षा पुनर्परीक्षा, मूल्यमापन कार्यपद्धती निश्चित

पुणे :

बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार हक्क नियम, २०२३ (सुधारणा) अधिसूचनेनुसार इयत्ता ५ वी व इयत्ता ८ वी साठी वार्षिक परीक्षा, पुनर्परीक्षा व मूल्यमापन कार्यपद्धती निश्चित करण्यात आली आहे. सन २०२३-२४ पासूनच ही कार्यपद्धती लागू करण्यात येत आहे. ५ वी साठी ५० तर ८ वी साठी ६० गुणांची वार्षिक परीक्षा होणार आहे. यात नापास होणाऱ्या विद्यार्थांना त्याच वर्गात ठेवले जाणार आहे. याबाबत राज्य शासनाच्या शालेय शिक्षण विभागाकडून आदेश जारी करण्यात आले आहे.

केंद्र सरकारने बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम, २००९ मधील कलम १६ मध्ये सुधारणा केली आहे. त्यानुसार इयत्ता ५ वी व ८ वी वर्गासाठी वार्षिक परीक्षा अनिवार्य केली आहे. त्यानुसार, इयत्ता ५ वी व ८ वी वर्गासाठी वार्षिक परीक्षा होणार आहे. बालक वार्षिक परीक्षा उत्तीर्ण होऊ शकले नसल्यास अतिरिक्त पूरक मार्गदर्शन प्रदान करून वार्षिक परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यापासून २ महिन्यांच्या आत पुनर्परीक्षेची संधी देण्यात येईल. जर ते बालक पुनर्परीक्षेत देखील नापास झाले, तर त्याला इयत्ता ५ वी च्या वर्गात किंवा इयत्ता ८ वी च्या वर्गात, जसे असेल तसे ठेवले जाईल. मात्र प्राथमिक शिक्षण पूर्ण होईपर्यंत कोणत्याही बालकास शाळेतून काढून टाकले जाणार नाही, असे जाहीर करण्यात आले आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top