सोलापूर
सोलापूर जिल्ह्यात असलेल्या भीषण पाणीटंचाईवर उपाय म्हणून येत्या १० मे रोजी उजनी धरणातून सोलापूरसाठी पाणी सोडण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिली. उजनी धरणातून १० मे रोजी साडेपाच टीएमसी पाणी सोडण्यात येणार असून ते सोलापूर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या औज व चिंचपूर बंधाऱ्यात २० मे रोजी पोहोचेल. त्यामुळे सोलापूर शहरात सुरळीत पाणीपुरवठा होईल.
उजनी धरणाची पाणीपातळी सध्या उणे ४२. ७५ टक्क्यांपर्यंत खाली आली आहे. वाढता उन्हाळा, बाष्पीभवन व पाणीपुरवठ्याच्या योजनांमुळे आठवडल्याला एक टिएमसी पाणी कमी होत आहे. यंदा कमी पाऊस झाल्यामुळे धरणात केवळ ३५ टिएमसी पाणीच साठू शकले होते. त्यामुळे धरणातील पाणीसाठाही लवकरच कमी झाला. तरीही सोलापूर शहराच्या भीषण पाणीटंचाईवर उपाय म्हणून हे पाणी सोडण्यात येणार आहे.