मुंबई- जौनपूर लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी मिळाल्यानंतर भाजपचे नेते कृपाशंकर सिंह यांनी आज सकाळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सदिच्छा भेट घेतली. या भेटीदरम्यान फडणवीस यांनी त्यांचे शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी ॲड.अखिलेश चौबे आणि उद्योजक विजय यादव उपस्थित होते. एकेकाळी काँग्रेसचे मुंबईतील वजनदार नेते आणि उत्तर भारतीयांचा आवाज म्हणून ओळखले जाणारे कृपाशंकर सिंह यांनी काही वर्षांपूर्वी भाजपमध्ये प्रवेश केला होता. मात्र, त्यांच्यावर म्हणावी तशी महत्त्वाची जबाबदारी पक्षनेतृत्वाने सोपविली नव्हती. यामुळे ते राजकीय विजनवासात गेले, असे वाटत असतानाच त्यांना लोकसभा निवडणूक लढवण्याची संधी देण्यात आली आहे. याबाबत आभार मानण्यासाठी कृपाशंकर सिंहांनी देवेंद्र फडणवीसांची सदिच्छा भेट घेतली.