उरण – उरणमधील रानसई धरणातील पाणीसाठा कमी होत चालला आहे. त्यामुळे महाराष्ट्र औद्योगिक विकास मंडळाने (एमआयडीसीने) येत्या १ डिसेंबर पासून उरणमध्ये आठवडयातून मंगळवार व शुक्रवार या दोन दिवशी पाणी पुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.उरण येथील एमआयडीसीचे उपअभियंता विठ्ठल पाचपुंड यांनी ही माहिती दिली आहे.
तालुक्यातील नागरी वसाहत व औद्योगिक विभागाला पाणी पुरवठा करणाऱ्या रानसई धरणातील पाण्याची साठवणूक क्षमता कमी झाल्याने एमआयडीसीने उरणमध्ये डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीपासून मंगळवार व शुक्रवार आशा दोन दिवसांच्या पाणीकापतीला सुरुवात केली आहे.
उरण तालुक्याचाऔद्योगिक विकास झपाट्याने होत चालला आहे. त्याचबरोबर लोकसंख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. तसेच इमारती ही मोठया प्रमाणात उभ्या रहात आहेत. मात्र ६० वर्षांपूर्वी उभारलेले धरणाचे, त्यातील गाळ ही काढण्यात आलेला नाही. यामुळे उरणला पाणी पुरवठा करणे दिवसेंदिवस कठीण बनत चालले आहे.त्यामुळे नाईलाजाने पाणी पुरवठामध्ये कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जून महिन्यापर्यंत पाणी पुरवठा करणे कठीण होणार आहे, अशी माहिती उरण एमआयडीसीचे उपअभियंता विठ्ठल पाचपुंड यांनी दिली आहे.