ऊसतोड व वाहतूक संघटनांचा इशारा
बारामती
ऊसतोडणी व वाहतुकीच्या दरात वाढ न झाल्यास २५ डिसेंबरपासून ऊसतोडणी, वाहतूक बंद केली जाईल, असा इशारा ऊसतोड व वाहतूक संघटनांनी दिला आहे. ऊसतोडणी वाहतूकदार-मुकादम यांचा ऊसतोडणी भाववाढीसाठी संप सुरू आहे. ऊसतोडणी संघटना व साखर संघ यांच्यात दर ३ वर्षांनी ऊसतोडणी व वाहतुकीचे दर ठरवले जातात. २७ टक्के भाववाढ देण्याचा प्रस्ताव साखर संघाने ठेवला आहे. मात्र ऊसतोडणी, वाहतूकदार, मुकादम यांच्या सर्व संघटना ५० टक्के भाववाढ झाली अशी मागणी करत आहे. २७ टक्क्यांवरून ५० टक्के वाढ न केल्यास ऊस संघटनांनी २५ डिसेंबरपासून ‘कोयता बंद’ ची हाक दिली आहे.
सन २०२०-२०२३ या ३ वर्षे कराररची मुदत संपली आहे. नवीन करार करण्यासाठी साखर संघासोबत आतापर्यंत ३ बैठका पार पडल्या आहेत. पहिल्या बैठकीमध्ये ७ टक्के, दुसर्या बैठकीमध्ये २४ टक्के, तिसर्या बैठकीमध्ये २७ टक्के भाववाढ देण्याचा प्रस्ताव साखर संघाने ठेवला आहे. शेजारील राज्यात महाराष्ट्रापेक्षा ऊसतोडणी व वाहतुकीच्या दरात मोठी तफावत आहे. त्याचा परिणाम म्हणून महाराष्ट्रातील मजूर दुसर्या राज्यात ऊसतोडणी, वाहतुकीसाठी जात आहेत. याचा राज्यातील साखर कारखान्यावर परिणाम झाला आहे. राज्यातील सर्व कारखान्यांमध्ये मजुरांचा अभाव आहे. त्यामुळे राज्यातील ५० टक्के कारखाने २४ तासांपैकी ८-१० तास उसा अभावी बंद ठेवावे लागत आहेत. त्यामुळे ऊसतोड व वाहतूक संघटनांनी आक्रमक होत २५ डिसेंबरपासून ऊसतोड बंद करण्याचा इशारा दिला आहे.