मुंबई – भारतीय जीवन विमा महामंडळाने (एलआयसी) अमृतबाल प्लॅन ही नवी स्कीम नुकतीच लाँच केली आहे. ही योजना आजपासून विक्रीसाठी खुली करण्यात आली आहे.
अमृतबाल ही एक वैयक्तिक बचत, जीवन विमा योजना आहे.आपल्या पाल्याचे उच्च शिक्षण आणि इतर गरजा पूर्ण करण्यासाठी पैशाची तरतूद असावी या उद्देशाने ही योजना तयार करण्यात आली आहे.पॉलिसीची मुदत संपेपर्यंत प्रत्येक वर्षाच्या शेवटी ८० रुपये प्रति हजार मूळ विमा रकमेच्या दराने हमी जोडणीद्वारे कॉर्पस फंड जमा करणे या योजनेमुळे सुलभ होते.
शुन्य ते तीस दिवस ही या योजनेसाठीची किमान वयोमर्यादा आहे. तर कमाल १३ वर्षांपर्यंतच्या पाल्याच्या नावे ही पॉलिसी विकत घेता येते.मॅच्युरिटीच्या वेळी किमान वय १८ वर्षे तर कमाल २५ वर्षे आहे.योजनेमध्ये ५,६ आणि ७ वर्षांची प्रिमियम पेमेंट टर्म उपलब्ध आहे. मर्यादित प्रिमियम पेमेंटसाठी पॉलिसी टर्म १० वर्षे आणि सिंगल प्रिमियम पेमेंट ५ वर्षे आहे.
योजनेची किमान विमा रक्कम २ लाख रुपये आहे. मात्र कमाल रकमेसाठी कोणतीही मर्यादा नाही. मॅच्युरिटीच्या तारखेला इन-फोर्स पॉलिसीसाठी गॅरंटीड अॅडिशन्ससह संपूर्ण विमा रक्कम देय असेल. तसेच मॅच्युरिटीची रक्कम ५, १० किंवा १५ वर्षांच्या टप्प्यांमध्ये सेटलमेंट पर्यायांद्वारे मिळविता येऊ शकते. एलआयसीचा प्रिमियम वेव्हर बेनिफीट रायडर काही अटींवर अतिरिक्त प्रिमियम भरून मिळविता येतो.
पॉलिसीच्या मुदतीदरम्यान काही अटींवर धारकाला कर्ज घेण्याची सोयही या योजनेमध्ये करण्यात आली आहे. ही योजना अधिकृत एजंट, इतर मध्यस्थांमार्फत ऑफलाईन तसेच एलआयसीच्या वेबसाईटवर ऑनलाईन खरेदी करता येईल.