नवी दिल्ली- भारतातील सर्वांत मोठी बँक समजल्या जाणाऱ्या भारतीय स्टेट बँकेने आर्थिक वर्ष २०२४-२५ साठी केंद्र सरकारला ८,०७६.८४ कोटी रुपयांचा लाभांशाचा धनादेश दिला आहे. एसबीआयचे चेअरमन सी.एस.सेठी यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याकडे हा धनादेश सुपूर्त केला.
यासंदर्भात अर्थमंत्री सीतारामन यांच्या कार्यालयाने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’ वर पोस्ट करत म्हटले की, “आर्थिक वर्ष २०२४-२५ साठी एसबीआयकडून ८,०७६.८४ कोटी रुपयांचा लाभांशाचा धनादेश अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना प्राप्त झाला आहे.” भारतीय सार्वजनिक क्षेत्रातील आघाडीच्या कंपन्यांनी २०२४-२५ च्या जानेवारी-मार्च तिमाहीत मोठ्या प्रमाणावर नफ्याची नोंद केली, ज्यामुळे सरकारच्या आर्थिक स्थितीत बळकटी येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. एसबीआयने तिमाहीत १८,६४३ कोटी रुपयांचा शुद्ध नफा कमावला, तर एलआयसीने १९,०१३ कोटी रुपयांचा नफा नोंदवला. पूर्ण आर्थिक वर्षासाठी एसबीआयचा एकूण शुद्ध नफा ७०,९०१ कोटी रुपये असा विक्रमी झाला आहे. मागील वर्षाच्या ६१,०७७ कोटी रुपयांच्या तुलनेत १६ टक्के वाढ झाली आहे.
एसबीआयने २०२४-२५ या आर्थिक वर्षांसाठी प्रति शेअर १५.९० रुपये लाभांश जाहीर केला आहे. हा लाभांश मागील वर्षासाठी वितरित केलेल्या प्रति इक्विटी शेअर १३.७० रुपयांपेक्षा जास्त आहे.
