भुवनेश्वर- लोकसभा निवडणुकीपूर्वी सत्ता गमावलेल्या राज्यांमध्ये काँग्रेस पुन्हा जनतेचा पाठिंबा मिळवण्याचा प्रयत्न करत आहे. या अनुषंगाने काँग्रेस सतत काहीतरी नवीन करण्याच्या विचारात आहे. ओडिशात दीर्घकाळ सत्तेपासून दूर असलेल्या काँग्रेसने याठिकाणी ‘ओडिशा फॉर ओडिया’ असा नवा नारा दिला आहे. हे राज्य यापुढे भूमिपुत्रांचेच असा संदेश कॉंग्रेसने या नार्यातून दिला आहे.
सत्ताधारी बिजू जनता दल आणि विरोधी भाजपामधील लोक राज्याच्या कारभारात “बाहेरील” लोकांना गुंतवून ओडिशाच्या स्वाभिमानाच्या विरोधात काम करत असल्याचा आरोप राज्य काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अजॉय कुमार यांनी रविवारी केला.
अजॉय कुमार म्हणाले की, “बाहेरचे” आता राज्याच्या राजकारणात, अर्थव्यवस्थेत आणि नोकरशाहीमध्ये मोठी भूमिका बजावत आहेत तर ओडिया लोकांचे महत्त्व दिवसेंदिवस कमी होत आहे. बाहेरील लोकांनाच येथील सर्व पैसा मिळतो .राज्यातील सुमारे ३५ हजार कोटी रुपयांची सरकारी कामाची कंत्राटे बाहेरच्या लोकांना देण्यात आली आहेत. ओडिशाचा सर्व पैसा बाहेरच्या लोकांकडे जात आहे. यामुळेच ओडिशा आजपर्यंत गरीब राज्य आहे.