बीड – बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड याने बीड न्यायालयात दोषमुक्ततेचा अर्ज दाखल केला आहे. मात्र या अर्जाला आवादा पवनचक्की प्रकल्पातील अधिकाऱ्यांनी कडाडून विरोध केला आहे.
वाल्मिक कराडने आवादा पवनचक्की कंपनीच्या शिवाजी थोपटेकडे २ कोटींची मागणी केली होती. २६ नोव्हेंबर २०२४ रोजी आरोपी सुदर्शन घुले याने शिवाजी थोपटे आणि सुनील शिंदे यांना जीवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर कराडच्या सहकाऱ्यानी ६ डिसेंबर रोजी पवनचक्की कंपनीच्या वॉचमनला मारहाण केली. या घटनेची माहिती संतोष देशमुख यांना फोनवरून मिळाली. हा वाद मिटवण्यासाठी संतोष देशमुख व गावातील काही लोक आले. सुदर्शन घुलेने देशमुख यांना धमकी दिली. त्यानंतर आरोपींनी ९ डिसेंबर रोजी संतोष देशमुख यांचे केज-बीड रोडवरील उमरी फाटा टोल नाका येथून अपहरण करून क्रूर पद्धतीने हत्या केली, असा आरोप आहे.या प्रकरणात वाल्मिक कराडने वकिलामार्फत न्यायालयात आपल्यावरील आरोप फेटाळत मी निर्दोष आहे, असा दावा केला होता. परंतु न्यायालयाने सरकारी वकील, तपासी अधिकारी तसेच आवादा प्रकल्प व्यवस्थापकांचे म्हणणे मागवले आहे. त्यानंतर आवादा पवनचक्की कंपनीचे अधिकारी शिवाजी थोपटे आणि सुनील शिंदे यांनी कोर्टात शपथपत्र सादर करून कराडच्या अर्जाला विरोध केला.