कराड- मुस्लिम समाजाला ॲट्रॉसिटीसारखा कायदा मिळाला पाहिजे.आतापर्यंत मुस्लिम समाज कधीही रस्त्यावर उतरला नव्हता. परंतु, आज केवळ पुरुष नव्हे तर मुस्लिम समाजातील महिलासुद्धा रस्त्यावर उतरत आहेत. येत्या दोन दिवसात आमच्या आंदोलनाची दखल न घेतल्यास आम्ही पाणीत्याग आंदोलन करणार,त्यानंतरच्या परिस्थितीला सरकार जबाबदार असेल असा इशारा जावेद नायकवडी यांनी दिला. अल्पसंख्यांक मुस्लिम समाजास संरक्षण कायदा लागू करावा, यासह विविध मागण्यांसाठी कराड येथील तहसील कार्यालयासमोर गेल्या चार दिवसांपासून समतापर्व संयोजन समितीच्यावतीने उपोषण सुरू आहे.आतापर्यंत जिल्ह्यातील आणि परजिल्ह्यातील मुस्लिम तसेच इतर समाजातील नागरिकांनी या आंदोलनाला भेट दिली.मात्र पालकमंत्र्यांनी अद्याप या आंदोलनाची दखल घेतलेली नाही.त्यामुळे मुस्लिम समाजात नाराजी व्यक्त केली जात आहे.या पार्श्वभूमीवर उपोषणस्थळी नवाज सुतार म्हणाले की, सातारा जिल्ह्याला सध्या पालकमंत्री आहेत की नाहीत हेच आम्हाला समजत नाही.आमच्या आंदोलनातील दोन सहकारी दवाखान्यात उपचार घेत आहेत. येत्या दोन दिवसात या आंदोलनाची दखल घ्यावी व शासनाला आमच्या मागण्या पोहोचवाव्यात. महाराष्ट्रात मुस्लिम संरक्षण कायदा लवकरात लवकर व्हावा.मुस्लिम समाजाला शैक्षणिक व नोकरीत पाच टक्के आरक्षण मिळावे.