मुंबई
एअर इंडियाच्या अनेक कर्मचाऱ्यांनी अचानक आजारपणाची सुटी घेतल्याने कालपासून एअर इंडियाच्या ७० राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय विमान फेऱ्या रद्द कराव्या लागल्या आहेत. एअर इंडियाच्या व्यवस्थापनाविरोधात कर्मचाऱ्यांनी हे सामुहिक रजा आंदोलन केले.
व्यवस्थापनाच्या चुकीच्या धोरणांमुळे हे आंदोलन करण्यात आल्याचे केबिन कर्मचाऱ्यांच्या कामगार संघटनेने म्हटले आहे. एअर इंडियाचे ३०० केबिन क्रु या संघटनेचे सदस्य असून सध्या एअर इंडियाचे व्यवस्थापन कामगारांमध्ये भेदभाव करत असल्याचा आरोप त्यांनी केला. त्याचबरोबर कंपनीच्या व्यवस्थापनाने काही दिवसांपूर्वी कर्मचाऱ्यांचा निवासी भत्ता बंद केला. कंपनी जवळच्या लोकांपेक्षा बाहेरून कामगारांची भरती करत असल्याचाही त्यांचा आरोप आहे. त्यामुळे एकाच दिवशी कंपनीच्या बहूतेक केबिन कर्मचाऱ्यांनी तब्येत बरी नसल्याचे कारण सांगत सामुहित रजा आंदोलन केले. एअर इंडियाने मात्र प्रवाशांची माफी मागत ऑपरेशन मधील तांत्रिक बिघाडांमुळे उड्डाणे रद्द केल्याचे सांगितले आहे. हा विषय आता समाजमाध्यमावरही चर्चेला आला असून प्रवाशांनी आपल्या तिकीटांचे पैसे परत करण्याची मागणी केली आहे.