नाशिक-
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने लगबगीने कांद्यावरील निर्यात बंदी उठवली. मात्र निर्यातीनंतर चार दिवस जेएनपीटीचे संकेतस्थळ अपडेट झाले नाही. त्यामुळे निर्यातीवरील कराराबाबत स्पष्टता आली नाही. याचा परिणाम म्हणून तब्बल ४०० हून अधिक कंटेनर मुंबईच्या जवाहरलाल नेहरू बंदर प्राधिकरणा (जेएनपीटी) येथेच अडकले होते.
काल दुपारी संकेतस्थळ अपडेट झाल्यानंतर जवळपास ५० टक्के कंटेनर हे मार्ग मार्गस्थ झाले, मात्र अजूनही ५० टक्के कंटेनर जेएनपीटीतच अडकले आहेत. पुढील दोन ते तीन दिवसात हे कंटेनर मार्गस्थ होतील, अशी अशा निर्यातदार व्यक्त करत आहेत. “नाशिकच्या जानोरीतील दीडशे ते पावणे दोनशे कंटेनर जेएनपीटीबाहेर आहेत. निर्यात सुरळीत होण्यासाठी २ दिवस लागण्याची चिन्ह आहेत,” अशी माहिती महाराष्ट्र राज्य कंटेनर मालक संघटनेचे सदस्य भारत शिंदे यांनी दिली. दरम्यान, जेएनपीटीत ४०० हून अधिक कंटेनर अडकल्याचा फटका नाशिक जिल्ह्यातील बाजार समितीला बसला. जिल्ह्यातील सर्वच बाजार समितीमध्ये कांदा दरात पुन्हा ४०० ते ५०० रुपयांची घसरण झाली. काल कांद्याचे दर प्रति क्विंटल १७०० ते १८०० रुपयांपर्यंत आले.