मुंबई – कांद्याच्या प्रश्नावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांची भेट घेतली. केंद्र सरकार लवकरच कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी सकारात्मक निर्णय घेईल असे, पियुष गोयल यांनी फडणवीसांना आश्वासन दिले आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी एक्सवरून याबाबत माहिती दिली आहे.
कांदा निर्यातबंदीनंतर महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या समस्यांचे गोयल यांना भेटून निवेदन दिले. सह्याद्री अतिथीगृहावर पियुष गोयल आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट झाली. या भेटीनंतर देवेंद्र फडणवीस म्हणाले, शेतकरी बांधवांच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या कांदा, कापूस व सोयाबीन या विषयांवर केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांच्याबरोबर एक सकारात्मक बैठक सह्याद्री अतिथी गृह मुंबई येथे झाली.गोयल यांनी शेतकरी हिताचे सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन या बैठकीत दिले.
उद्या दिल्लीत मंत्री पीयुष गोयल यांच्या अध्यक्षतेखाली कांदा प्रश्नावर महत्त्वाची बैठक होणार आहे. या बैठकीला राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह नाशिकमधील व्यापारी उपस्थित राहण्याची शक्यता आहे. केंद्राने कांदा निर्यात बंदी केल्याने जिल्ह्यातील कांदा लिलाव बंद आहेत. मंत्री पियुष गोयल, नितीन गडकरी यांची भेट घेणार असल्याची माहिती आमदार दिलीप बनकर यांची माहिती आहे.