नवी दिल्ली
बारावी नंतर एलएलबीची पदवी मिळवण्यासाठीचा ५ वर्षांच्या अभ्यासक्रमाचा कालावधी तीन वर्षे करण्याची मागणी करणारी याचिका आज सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली आहे. ५ वर्षांचा कालावधीही कमीच आहे, असे म्हणत सरन्यायाधीश धनंजय चंद्रचुड व न्यायमूर्ती जे. बी. पार्डीवाला यांच्या खंडपीठाने या प्रकणावर सुनावणी घेण्यास नकार दिला. त्यानंतर याचिकाकर्त्यांने ही याचिकाच मागे घेतली.
याचिकाकर्त्याच्या वतीने अॅडव्होकेट अश्विनी उपाध्याय म्हणाले की, सध्या बीए-एलएलबी अभ्यासक्रम ५ वर्षांचा आहे, तो तीन वर्षांचा करण्याची गरज आहे. विद्यार्थी तीन वर्षांत म्हणजे सहा सेमिस्टरमध्ये १५ ते २० विषयांचा सहज अभ्यास करू शकतात. त्यामुळे बॅचलर ऑफ लॉ (एलएलबी) अभ्यासक्रमासाठी सध्याचा पाच वर्षांचा म्हणजेच १० सेमिस्टरचा कालावधी योग्य नाही. यामुळे विद्यार्थ्यांवर दीर्घ पदवी पूर्ण करण्यासाठी आर्थिक भार पडतो. यावर सरन्यायाधीशांनी हा कालावधीही खूप कमी आहे, असे आपले मत नोंदवत याचिका फेटाळली.