मुंबई
मुंबई लोकलमधील अनियंत्रित गर्दीमुळे अनेकांना जीव गमवावा लागला आहे. या गर्दीचे नियंत्रण करण्यासाठी मध्य रेल्वे प्रशासनाने मुंबईतील विविध कंपन्यांना त्यांच्या कार्यालयीन वेळेत बदल करण्याचे आवाहन केले होते. मात्र केवळ ३३ कंपन्यांनी रेल्वे प्रशासनाच्या या आवाहनानुसार कार्यालयीन वेळेत बदल केले आहेत. इतर शासकीय आणि खासगी कंपन्यांनी रेल्वे प्रशासनाच्या या आवाहनाकडे दुर्लक्ष केले आहे.
रेल्वे लोकलने रोज हजारो नागरिक प्रवास करतात. सकाळी ७ ते १० वाजेपर्यंत आणि संध्याकाळी ५ ते रात्री १० या वेळेत रेल्वे लोकलला अनियंत्रित गर्दी असते. त्यामुळे अनेक प्रवाशांना दरवाजाबाहेर लटकून प्रवास करावा लागतो. शासकीय आणि खासगी कंपन्यांची कार्यालयीन वेळ एकच असल्याने प्रवाशांना गर्दीचा सामना करावा लागतो. ह्याच गर्दीचे नियंत्रण करण्यासाठी रेल्वे प्रशासनाने शासकीय आणि खासगी कंपन्यांना कार्यालयीन वेळा बदलण्याचे आवाहन केले होते. याबाबत रेल्वे प्रशानाने ६०० शासकीय आणि खासगी कंपन्यांना पत्र लिहून कार्यालयीन वेळ बदलण्याची विनंती केली होती. कार्यालयीने वेळेत बदल केल्यास गर्दी नियंत्रित होऊ शकते. मात्र केवळ ३३ कंपन्यांनी त्यांच्या कार्यालयीन वेळेत बदल केले आहेत. इतर खासगी आणि शासकीय कंपन्यांनी रेल्वेच्या या आवाहनाकडे दुर्लक्ष केले. याबाबत रेल्वे प्रशासन आता रेल्वे मंत्रालयाला पत्र पाठविणार आहे.