मुंबई- मुंबईतील एका कार्यक्रमात पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी कोरोना काळात ४ हजार कोटींचा खर्च करण्यात आल्याचा दावा केला होता, पण कोरोना काळातील ४ हजार कोटींच्या खर्चाचा तपशील पालिकेकडे उपलब्ध नसल्याची धक्कादायक बाब आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांना माहिती अधिकारातून मिळालेल्या उत्तरातून समोर आली आहे.
आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी महापालिका आयुक्त कार्यालयात अर्ज करत कोरोना काळात करण्यात आलेल्या ४ हजार कोटींच्या खर्चाबाबत सादर केलेल्या अहवालाची प्रत मागितली होती.आयुक्त कार्यालयाने गलगली यांचा अर्ज आरोग्य विभागाचे उप प्रमुख लेखापाल यांच्याकडे हस्तांतरित केला.त्यावेळी उपप्रमुख लेखापाल लालचंद माने यांनी या अहवालाची प्रत उपलब्ध नसल्याचे सांगत हा अर्ज सार्वजनिक आरोग्य विभागाचे उपायुक्त यांच्याकडे हस्तांतरित केला. प्रशासकीय अधिकारी चि. गे.आढारी यांनी हा अर्ज वित्त विभागाचे प्रमुख लेखापाल यांच्याकडे हस्तांतरित केला. लेखा अधिकारी राजेंद्र काकडे यांनी माहिती उपलब्ध नसल्याचे सांगत अर्ज पुन्हा आरोग्य विभागाचे उप प्रमुख लेखापाल यांच्याकडे हस्तांतरित केला.
दरम्यान,एकीकडे कोविड काळात भ्रष्टाचार आणि अनियमितता झाल्याचा आरोप होत असताना दुसरीकडे स्वतः पालिका आयुक्त ४ हजार कोटींचा हिशोब देत नाही, ही बाब गंभीर असल्याचे गलगली म्हणाले.
कोरोना काळातील ४ हजार कोटींच्या खर्चाचा तपशीलच पालिकेकडे नाही
![](https://navakal.s3.ap-south-1.amazonaws.com/webcontent/2023/11/download-1-3.jpg)