कोल्हापूर – विविध मागण्यांच्या पुर्ततेसाठी कोल्हापूर महानगरपालिका परिवहन विभागाच्या कर्मचारी आजही काम बंद आंदाेलनावर ठाम राहिल्याने ४२ मार्गावरील बस सेवा सलग दुस-या दिवशी ठप्प होती. यामुळे प्रवाशांना इच्छितस्थळी जाण्यासाठी खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागला. परिणामी प्रवाशांचा खिशा रिकामा होत आहे.
रोजंदारी कर्मचाऱ्यांना कायम करावे, महागाई भत्ता वाढवून द्यावे या मागण्यांकडे महानगरपालिका प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने केएमटी कर्मचारी संपावर गेले आहेत. महानगरपालिका प्रशासनाने मागण्या मान्य कराव्यात अशी मागणी कर्मचाऱ्यांनी केली आहे. कोल्हापूर महानगरपालिका परिवहन विभागाच्या कर्मचारी शुक्रवारी संपावर जाताच महानगरपालिका प्रशासनाने एक बैठक बाेलावली. या बैठकीस केएमटी कर्मचाऱ्यांचे प्रतिनिधी देखील उपस्थितीत हाेते. या बैठकीत कोणताच तोडगा न निघाल्याने आज दुसऱ्या दिवशीही कर्मचा-यांनी संप सुरूच ठेवल्याचे सांगितले. केएमटी कर्मचाऱ्यांच्या संपाचा फटका ४२ मार्गावरील बस सेवेवर झाला आहे.