नाशिक
नाशिकला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणातील गाळ काढल्याने या धरणातील पाणी क्षमतेत २ कोटी १५ लाख ८८ हजार लिटरने वाढ झाली आहे. यंदा पाऊस कमी झाल्याने पाण्याची भीषण टंचाई जाणवत आहे. त्यातच येथील धरणांमध्ये गाळ असल्याने त्यातील पाणीसाठा कमी झाला आहे. ७ टीएमसी क्षमता असणाऱ्या गंगापूर धरणाची क्षमता गाळामुळे ५.५ टीएमसीपर्यंत कमी झाली होती. त्यामुळे या धरणातील गाळ काढण्याचे काम हाती घेण्यात आले.
मागील १४ दिवसांपासून हे गाळ काढण्याचे काम सुरु आहे. यावेळी धरणातून २१ हजार ६२३ क्युबिक मीटर गाळ काढण्यात आला आहे. यामुळे धरणाची पाणी साठवण्याची क्षमता वाढली आहे. धरणातून दररोज १० तास जेसीबीच्या सहाय्याने गाळ काढला जातो. हा गाळ परिसरातील शेतकऱ्यांच्या शेतात पोहचवला जातो. दरम्यान हे काम १५ जूनपर्यंत सुरू राहणार असल्याने धरणाच्या क्षमतेत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.