नवी दिल्ली- गरबा कार्यक्रमात केवळ हिंदूंना प्रवेश द्या, अशी मागणी विश्व हिंदू परिषदेने केली आहे. तसेच कार्यक्रमात प्रवेश देताना सर्वांचे आधार कार्ड तपासा, असे आवाहनही परिषदेने केले आहे. या मागणीला भाजप नेते नितेश राणे यांनी दुजोरा दिला आहे. या मागणीमुळे राज्यभरात गरब्यावरुन नवा वाद पेटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. दांडिया खेळायला येणारे हिंदू आहेत की नाही ते तपासा, अशी मागणी भाजप आमदार नितेश राणेंनी केली आहे. तर शिंदे गटानेही नितेश राणेंच्या मागणीचे समर्थन केले आहे. ‘गरबा हा श्रद्धेचा आणि भक्तीचा विषय आहे, गरबा आयोजनाच्या स्थळी देवीबद्दल श्रद्धा नसलेल्या, भक्ती नसलेल्यानी प्रवेशच करू नये. तिथे फक्त हिंदू धर्मियांनी प्रवेश करावे.गरबा कार्यक्रमात अनेक इतर धर्मीय तिथे प्रवेश घेतात आणि हिंदू महिला आणि तरुणींची छेड काढतात,’ असा आरोपही विश्व हिंदू परिषदेचे महाराष्ट्र आणि गोवा प्रांत मंत्री गोविंद शेंडे यांनी केला आहे.