नवी मुंबई- आज मंगळवारी गुढीपाडव्यानिमित्त वाशी येथील नवी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या फळ बाजारात आंब्याची मोठी आवक झाली होती. गेल्यावर्षी याच दिवशी २५ हजार आंब्याच्या पेट्या दाखल झाल्या होत्या.मात्र यंदाच्या वर्षी आंब्याची आवक दुप्पट झाली होती, अशी माहिती येथील काही व्यापाऱ्यांनी दिली
साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त समजल्या जाणाऱ्या गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर एपीएमसी फळ बाजारात आंब्याची विक्रमी आवक झाली होती यंदा ५० हजार आंब्याच्या पेट्या या बाजारात दाखल झाल्या होत्या. तसेच आज आंब्याचे दरही ३०० ते ८०० रुपये डझन असे सामान्य ग्राहकाच्या आवाक्यातील
होते.त्यामुळे सणासुदीला आंबे खवय्यांसाठी ही पर्वणी ठरल्याचे या व्यापाऱ्यांनी सांगितले.यंदा गुढीपाडव्याला आंबा खरेदीसह नागरिक अन्य फळांची देखील विचारपूस करीत होते.यामध्ये विदेशी फळांना देखील काही जण पसंती देताना दिसत होते.