मुंबई- चेंबूर येथील मुंबई पालिकेच्या शाळेत वितरित करण्यात येणाऱ्या माध्यान्ह भोजनातून १७ विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याने एकच गोंधळ उडाला. यासर्व विद्यार्थ्यांना सध्या गोवंडीमधील शताब्दी रुग्णालयात दाखल करण्यात आले. सर्व विद्यार्थ्यांची सध्या प्रकृती स्थिर आहे.
चेंबूरच्या वाशी नाका, शंकर देऊळ परिसरातील महापालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना आज सकाळी माध्यन्ह भोजन (डाळ आणि खिचडी) आले होते. इयत्ता सहावी आणि सातवीमधील विद्यार्थ्यांना माध्यन्ह भोजन दिल्यानंतर काही वेळातच विद्यार्थ्यांना मळमळ आणि उलट्या होऊ लागल्या. ही बाब शिक्षकांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी तात्काळ विद्यार्थ्यांना शताब्दी रुग्णालयात दाखल केले.रुग्णालयात या विद्यार्थ्यांवर तात्काळ उपचार सुरू करण्यात आले. त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती शताब्दी रुग्णालयातील मुख्य अधिष्ठाता सुनील पाकळे यांनी दिली.