मुंबई- मुंबई-जयपूर एक्सप्रेसवरील गोळीबार प्रकरणी आरपीएफचा जवान चेतन सिंह चौधरीची पत्नी प्रियंका हिने काही दावे केले. प्रियंका यांनी सांगितले की, ‘गोळीबाराची घटना घडली, त्यापूर्वी चेतनची मानसिक स्थिती ठीक नव्हती. हिंदुंना धोका आहे, असा विचार त्याच्या मनात सतत घोळत असायचा. आरपीएफ अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळेच ही गोळीबाराची घटना घडली. चेतनच्या मेंदूत गुठळी असल्याची माहिती आम्ही अधिकाऱ्यांना दोन वर्षांपूर्वी दिली होती. त्याची मानसिक स्थिती अत्यंत बिकट होती. त्यामुळे चेतनला शस्त्रे बाळगण्याची परवानगी द्यायची गरज नव्हती.’
चेतनच्या पगारातील अर्धी रक्कम राम मंदिरासाठी द्यायची आहे, त्यामुळे त्याचे बँक खाते खुले करावे, अशी मागणीही प्रियंकाने केली आहे. चेतन सिंगचे वकील अनिल मिश्रा यांनी न्यायालयासमोर लेखी युक्तिवाद केला आहे की, ‘घटनेच्या वेळी चेतन नैराश्येत होता.’ १६ डिसेंबर रोजी या प्रकरणाची सुनावणी होणार असून त्यावेळी चेतनला न्यायालयात हजर केले जाणार आहे. चेतन सिंगने ३१ जुलै रोजी मुंबई-जयपूर एक्सप्रेसमध्ये गोळीबार करून ३ प्रवासी आणि एका आरपीएफ अधिकाऱ्याला ठार केले होते.