रायपूर
छत्तीसगडच्या नारायणपूर जिल्ह्यात सुरक्षा दलासोबत झालेल्या चकमकीत ७ नक्षलवादी ठार झाले आहेत. यामध्ये दोन महिलांचा देखील समावेश आहे. आज सकाळी नारायणपूर-कांकेर सीमा भागातील अबूझमाड येथे सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाली. या चकमकीत ७ नक्षलवाद्यांना ठार करण्यात सुरक्षा दलाला यश आले. जिल्हा रिझर्व्ह गार्ड, स्पेशल टास्क फोर्स यांच्या संयुक्त पथकाने ही कारवाई केली.
अबुझमदच्या तकामेटा भागात मोठ्या प्रमाणात नक्षलवादी उपस्थित असल्याची माहिती सुरक्षा दलाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे काल रात्री उशिरा सुरक्षा दलाने शोध मोहिम सुरु केली. त्यानंतर आज सकाळी ७ नक्षलवाद्यांना ठार करण्यात सुरक्षा दलाला यश मिळाले. सुरक्षा दलाचे अधिकारी ठार झालेल्या नक्षलवाद्यांची ओळख पटवण्याचा प्रयत्न करत आहेत. घटनास्थळावरून सुरक्षा दलाने शस्त्रे आणि स्फोटके जप्त केली आहेत. गेल्या १५ दिवसांत नक्षलवाद्यांनी केलेही दुसरी मोठी कारवाई आहे. यापूर्वी १६ एप्रिल रोजी कांकेर जिल्ह्यात सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाली होती. या चकमकीत सुरक्षा दलाने २९ नक्षलवाद्यांना ठार केले.