टाटांच्या एअर इंडियाला कामगार मंत्रालयाची नोटीस

नवी दिल्ली

टाटा समूहाच्या एअर इंडिया एक्सप्रेसला केंद्रीय कामगार मंत्रालयाने कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.विमानसेवा व्यवस्थापन आणि कर्मचारी (केबिन क्रू) यांच्यामधील वादाच्या संदर्भात नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी कामगार मंत्रालयाने ही नोटीस बजावली आहे. प्रवासापूर्वीच्या विश्रांतीच्या काळातील रुम शेअरिंगबद्दल एअर इंडिया एक्सप्रेसच्या अनेक केबिन क्रू सदस्यांनी चिंता व्यक्त केली होती. या प्रकरणी सदस्यांनी औद्योगिक वाद निवारण कायदा १९४७ अंतर्गत केंद्रीय कामगार विभागाकडे तक्रार दाखल केली होती.

क्रू सदस्यांनी केलेल्या या तक्रारीबाबत एअर इंडिया एक्सप्रेसने कोणताही प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे कामगार मंत्रालयाने एअर इंडियाला कारणे दाखवा नोटीस बजावाली आहे. गेल्या महिन्यात नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने एअर इंडियाला १० लाख रुपयांचा दंड ठोठावला होता. त्यानंतर कंपनीला कारणे दाखवा नोटीसही देण्यात आली होती. प्रवाशांना देण्यात येणाऱ्या सुविधांच्या निकषांचे उल्लंघन केल्याबद्दलही एअर इंडियाला नोटीस आणि दंड ठोठावण्यात आला आहे. विमानप्रवासादरम्यान प्रवाशांची सुरक्षा आणि त्यांना मिळणाऱ्या सुविधांचा गांभीर्याने विचार करत, नागरी विमान वाहतूक महासंचालनालयने मे २०२३ पासून अनेक प्रमुख विमानतळांना भेट देऊन विमान कंपन्यांची तपासणी करण्यास सुरुवात केली आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top