मुंबई
कर्जत तालुक्यातील माथेरानजवळील पेब किल्ल्यावर काहीजण ट्रेकींगसाठी गेले होते. पेब किल्ल्यावरून परतत असताना यातील २७ वर्षीय तरूणी ऐश्वर्या धालगडे हिचा पाय घसरला आणि ती ४०० फूट खोल दरीत कोसळली. शनिवारी दुपारच्या सुमारास ही घटना घडली. या घटनेची माहिती मिळताच माथेरान पोलीस, सह्याद्रीचे स्वयंसेवक, वन कर्मचारी, डॉ. सचिन वाणी आणि इतर घटनास्थळी पोहोचले. तब्बल ७ तासांच्या रेस्क्यू ऑपरेशननंतर ऐश्वर्याला सुखरुप बाहेर काढण्यात यश आले.
अंधेरी येथील तरूणी ऐश्वर्या धालगडे तिच्या मित्रांसोबत पेब किल्ल्यावर ट्रेकिंगसाठी गेली होती. किल्ल्यावरून ते पायथ्याशी येत होते. तेव्हा व्ही आकाराच्या दरीजवळ ऐश्वर्याचा पाय घसरला आणि ती थेट दरीत कोसळली. दरीतील झाडामुळे ती बचावली. पण तिच्या कंबरेला आणि पायाला दुखापत झाली. यानंतर तात्काळ तिच्या एका मित्राने पोलीस नियंत्रण कक्षाला या प्रकाराची माहिती दिली. नेरळजवळील आंबेवाडी येथील आदिवासींनीही तिला बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांच्या प्रयत्नांना यश आले नाही. या घटनेची माहिती मिळताच माथेरान पोलीस, सह्याद्रीचे स्वयंसेवक, वन कर्मचारी, डॉ. सचिन वाणी आणि इतर घटनास्थळी पोहोचले. दुपारी १:३० वाजण्याच्या सुमारास सुरू झालेले रेस्क्यू ऑपरेशन रात्री ८ वाजता यशस्वीरित्या पूर्ण झाले. स्वयंसेवकांनी एक रुग्णवाहिका देखील पायथ्याशी सज्ज ठेवली होती. ऐश्वर्याला दरीतून बाहेर काढल्यानंतर तिची तपासणी करून उपचारासाठी तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले.