पालकांची मागणी
पेण :
वातावरणात निर्माण झालेला उष्मा लक्षात घेता हवामान खात्याने उष्माघाताची शक्यता वर्तवली आहे. अशा परिस्थितीत परीक्षा संपून देखील अनेक शाळा अद्यापही सुरू आहेत. पेण जिल्ह्यातील सीबीएससी आणि आयसीएससी बोर्डाच्या इंग्रजी माध्यमाच्या शाळा बंद करून विद्यार्थ्यांना उन्हाळी सुट्टी देण्याची मागणी पालकवर्गातून होत आहे.
सध्या पेणमध्ये तापमान सुमारे ४० अंश डिग्रीच्या पुढे गेले आहे. कडक उन्हात घराबाहेर जाणे धोकादायक ठरते आहे. हवामान खात्याने दिलेल्या इशाऱ्यानुसार, सध्या वातावरणामध्ये उष्मा वाढला असून विनाकारण घराबाहेर पडणे टाळण्याचा सल्ला दिला आहे. तालुक्यातील वातावरणामध्ये अचानक झालेल्या बदलामुळे उष्णतेचे प्रमाण अतिशय वाढले आहे. त्यामुळे शाळांच्या अभ्यासक्रमानुसार आवश्यक आहेत, त्या शाळा सकाळच्या सत्रामध्ये ८ ते ११ या वेळेत सुरू ठेवाव्यात, जेणेकरून विद्यार्थ्यांचे उष्माघातापासून संरक्षण होईल, असे पालकांचे म्हणणे आहे. याबाबत गट शिक्षण अधिकाऱ्यांना तालुक्यातील सर्व शाळांना आदेश काढण्यास सांगितले आहे.