तुळजापूर
तुळजापूरच्या तुळजाभवानीला भाविक मोठ्या श्रद्धेने दानरूपी सोने चांदी अर्पण करतात. हे सोने आणि चांदी वितळवण्यास रिझर्व्ह बँकेने परवानगी दिली आहे. याबाबत धाराशीवचे जिल्हाधिकारी सचिन ओंबासे यांनी माहिती दिली. गेल्या १० वर्षांमध्ये तुळजाभवानीच्या चरणी २०० किलो सोने आणि सुमारे साडे चार हजार किलो चांदीचे दागिने अर्पण करण्यात आले आहेत. आता हे दागिने वितळवून त्याचे मोठे ब्लॉक (लगडी) तयार करण्यात येणार आहेत.
हे ब्लॉक राष्ट्रीयकृत बँकेत ठेवले जातील, ज्यातून मंदिराला भविष्यात उत्पन्न मिळणार आहे. त्यामुळे मंदिर संस्थानवर असलेली या सोने आणि चांदीच्या सुरक्षेची जबाबदारी कमी होणार आहे. सोने चांदी वितळवण्याची पारदर्शक पद्धत अभ्यासण्यासाठी तुळजाभवानी मंदिराचे पदाधिकारी मुंबईच्या सिद्धिविनायक मंदिराला भेट देणार आहेत. हे सोने दागिने वितळवण्यास विधी व न्याय विभागाने मंजुरी दिली आहे. लवकरच ही प्रक्रिया सुरु केली जाणार आहे.
भक्तांनी २००९ पासून देवीला २०७ किलो सोने आणि २,५७० किलो चांदी अर्पण केली आहे. २०७ किलो सोन्यातून १११ किलो शुद्ध सोने मिळू शकते, असा अंदाज आहे. यापूर्वी देवीकडे ४७ किलो इतके शुद्ध २४ कॅरेट सोने आहे. यानंतर देवीकडे जवळपास १५० किलो शुद्ध सोने जमा होऊ शकते. दरम्यान, देवीच्या डब्यातील पुरातन दागिने मोजदाद प्रकरणी चौकशी समितीने दिलेल्या अहवालावर मंदिर संस्थानचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी डॉ सचिन ओम्बासे यांनी बैठक घेतली. अहवालावर चर्चा करुन समितीने काढलेल्या निष्कर्षानंतर कायदेशीर काय कारवाई करायची यासाठी विधी विभागाचे मार्गदर्शन मागवले आहे. येत्या आठवड्यात ते मिळण्याची शक्यता आहे.