हैदराबाद –
बिहारनंतर आता तेलंगणामध्येही जातनिहाय जनगणना होणार आहे. मुख्यमंत्री रेवंथ रेड्डी यांनी आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वी जातीय जनगणाना करण्याचे आश्वासन दिले होते. यानुसार आता तेलंगणातील काँग्रेस सरकार जातनिहाय जनगणनेच्या तयारीला लागले आहे. याबाबत तेलंगणात मुख्यमंत्री रेड्डी यांच्या अध्येक्षतेखाली राज्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक पार पडली.
वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत पार पडलेल्या बैठकीत मुख्यमंत्री रेड्डी यांनी अल्पसंख्याक, मागासवर्गीय आणि आदिवासी कल्याण विभागांशी संबंधित समस्यांवर बैठक घेऊन जातनिहाय जनगणना करण्याचे निर्देश दिले आहेत. जातनिहाय जनगणनेबाबत मुख्यमंत्री रेड्डी यांनी काल एक निवेदनपत्र प्रसिध्द केले. तसेच सरकारने गरीब कुटुंबातील मुलींच्या लग्नांबाबत देखील एक निर्णय घेतला आहे. दारिद्रयरेषेखालील कुटुंबातील (बीपीएल) मुलीच्या लग्नासाठी सरकार एक लाख रुपयांची आर्थिक मदत आणि एक तोळे सोनेही देणार आहे. काँग्रेस सरकारने कल्याणमस्तु योजना लागू केली आहे. मुख्यमंत्र्यांनी सरकारी निवासी शाळांची माहिती देण्याबरोबरच भाड्याच्या इमारतीत चालणाऱ्या संस्थांची माहिती सरकारने मागवली आहे. या शाळांच्या इमारत बांधकामासाठी जागांचा शोध घेण्याचेही निर्देश मुख्यमंत्र्यानी दिले आहेत. दरम्यान, याआधीही बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनीदेखील आपल्या राज्यात जातनिहाय जनगणना केली होती.