मुंबई : सर्वसामान्य व गरीब जनतेचा सणांचा गोडवा आणखी वाढावा, यासाठी राज्य शासनाकडून देण्यात येणारा ‘आनंदाचा शिधा’ बुधवार(दि.२५ऑक्टोबर ) पासून मिळणार आहे. मागील महिन्यात गौरी-गणपती काळात लाभार्थ्यांना ‘आनंदाचा शिधा’ कीटमध्ये शंभर रुपयांत साखर, तेल, रवा व हरभरा डाळ प्रत्येकी एक किलोप्रमाणे देण्यात आली होती. आता दिवाळीसाठी ‘आनंदाचा शिधा’त आणखी पोहे व मैदा या दोन वस्तूंची वाढ केली आहे.
दिवाळीसाठी मिळणारा ‘आनंदाचा शिधा’ चे वाटप बुधवार, २५ ऑक्टोबरपासून करण्याचे आदेश राज्य शासनाने दिले आहेत. राज्यात या योजनेअंतर्गत १ कोटी ५८ लाख ३३ हजार ७१८ कार्डधारकांना लाभ मिळेल. कार्डधारकांना देण्यात येणार्या या संचातील वस्तूंच्या दर्जाबाबत दक्षता घ्या, अशा सूचना राज्य शासनाने दिल्या आहेत. मैदा आणि रवा या वस्तूंची खाण्यायोग्य मुदत संपण्यास किमान तीन महिन्यांपेक्षा अधिक, तर अन्य चार पदार्थांसाठी चार महिन्यांपेक्षा अधिक कालावधी राहणार नाही, याचीही खात्री करण्याची सूचना दिली आहे. या शिधा संचापैकी पोहे जिल्ह्यात गुरुवारी दाखल झाले. येत्या चार-पाच दिवसांत सर्वच वस्तू दाखल होतील आणि शिधा वाटपाचे किट पूर्ण झाल्यानंतर दुकानदारांना त्याचे वितरण केले जाईल आणि त्यानंतर ते ग्राहकांना दिले जाणार आहे.