देवगड – नवीन वर्षाच्या पहिल्या आठवड्यात तालुक्यात पडलेल्या अवकाळी पावसामुळे आंबा पिकाला मोठा फटका बसला आहे. अवकाळीमुळे आंब्याच्या झाडावरील मोहर आणि छोट्या कैर्या गळून पडल्याने झालेल्या नुकसानीमुळे बागायतदार धास्तावला आहे.
कृषी विभागाच्या पथकाने तालुक्यातील आंब्याच्या बागांची नुकतीच पाहणी केली.बकुणकेश्वर,कातवण वाडा,हूरशी,पडेल आणि नाडण आदी गावांतील बागेत जाऊन काही प्रगतशील शेतकर्यांची भेट घेऊन या पथकाने नुकसानीचे पंचनामे केले. फळपीक विमा योजनेत सहभागी असलेल्या शेतकर्यांना नुकसानभरपाई मिळू शकणार आहे. आतापर्यंत सर्वच आंब्यांना मोहर आलेला नाही. काही ठिकाणी आलेला मोहर गळून पडला आहे. काही ठिकाणी छोट्या कैऱ्यांचा सडा पडल्याचे दिसून आले आहेब.पाऊस पडून गेल्यानंतर करपा रोगाचा प्रादुर्भाव होण्याची दाट शक्यता असते. त्यामुळे अशा रोगांच्या नियंत्रणासाठी फवारणी केली नसेल त्यांनी त्वरित फवारणी करून घेण्याचे आवाहन तालुका कृषी अधिकारी कैलास ढेपे यांनी केले.