वर्धा – द काश्मीर फाईल्स या सिनेमाने देशभर वादंग माजवल्यानंतर आता या सिनेमाचे निर्माते – दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी नव्या सिनेमाची घोषणा केली आहे. भारतीय स्वातंत्र्यलढ्यावर आधारित ‘द दिल्ली फाईल्स’ हा सिनेमा ते काढणार असून हो सिनेमा अनेकांची झोप उडवणार असल्याचा दावा त्यांनी केला आहे.
वर्धा येथील एका कार्यक्रमात बोलताना विवेक अग्निहोत्री म्हणाले की, ‘द काश्मीर फाईल्स’ या चित्रपटाने देशातील लाखोंचे डोळे उघडले, तर आता मी ‘द दिल्ली फाईल्स’ हा चित्रपट तयार करीत आहे. तो अनेकांची झोप उडवेल. हा चित्रपट भारताच्या स्वातंत्र्यलढ्यावर आधारित आहे. या लढ्याचे खरे चित्र पुढे आलेच नाही. खोटा इतिहास मांडण्यात आला. चुकीची माहिती देण्यात आली. म्हणून खरे काय घडले ते मी मांडणार. त्या काळात झालेले अत्याचार चित्रपट सांगेल. सत्याची मांडणी केली तर फतवे निघतात. पण मी त्याची चिंता करीत नाही.