मुंबई- मागील दोन महिन्यांपासून मुंबईतील हवेची गुणवत्ता खालावल्याने प्रदूषणात वाढ झाली आहे. तसेच शहरात विविध ठिकाणी सुरू असलेल्या बांधकामामुळे निर्माण होणारी धूळ या प्रदूषणाला कारणीभूत ठरत आहे. त्यामुळे आता धुळीचे प्रदूषण रोखण्यासाठी पालिका दिल्लीच्या धर्तीवर कृत्रिम पाऊस पाडणार आहे. यासाठी पालिकेने मागवलेल्या ‘एक्सप्रेस ऑफ इंटरेस्ट’ला चार स्वदेशी कंपन्यांनी प्रतिसाद दिला आहे. मात्र या प्रकल्पासाठी पालिकेने ‘ग्लोबल’ निविदा मागवल्या असल्यामुळे ‘स्वारस्य अभिरुची’साठी आणखी एक आठवडयाची मुदत वाढवण्यात आल्याची माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली.
प्रकल्पांच्या ठिकाणाहून बाहेर येणारी धूळ हवेत मिसळून प्रदूषण निर्माण होत असल्याचे स्पष्ट झाल्यामुळे पालिकेने बांधकाम प्रकल्पांसाठी नियमावली जाहीर केली आहे.२३ ऑक्टोबर रोजी जाहीर केलेल्या २७ प्रकारच्या नियमांमध्ये सर्वाधिक निर्देश बांधकाम प्रकल्पांना देण्यात आले आहेत.तसेच आतपर्यंत ८०० बिल्डरांना आपले काम बंद ठेवण्याच्या नोटिसा दिल्या आहेत.तर ६०० बांधकामांना कारणे दाखवा नोटिसा बजावल्या आहेत.वास्तविक या बिल्डरांच्यासाठी पालिकेने २७ प्रकाराची नियमावली तयार केली आहे.पण त्याचे अनेकांनी पालन केले नसल्याचे दिसून आले आहे.त्यामुळे धुळीचे कण हवेत मिसळून प्रदूषण वाढत चालले आहे.त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कृत्रिम पाऊस पाडण्याची सूचना पालिका प्रशासनाला केली होती. त्यामुळेच पालिकेने कृत्रिम पाऊस पाडणाऱ्या कंपन्यांकडून निविदा मागविल्या होत्या.त्यात चार भारतीय कंपन्यांनी प्रतिसाद दिला.मात्र परदेशी कंपन्यांकडून प्रतिसाद मिळाला नसल्याने त्यांच्यासाठी आठवडाभर वाट पाहण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे.