अहमदनगर – जंगलातून शिकार व पाण्याच्या शोधात आलेल्या बिबट्याने अहमदनगर शहर व परिसरात धुमाकूळ घातला होता.या बिबट्याला पकडण्यासाठी वन विभागाकडून पिंजरे लावण्यात आले होते. अखेर आज हा बिबट्या पिंजऱ्यात अडकल्याने परिसरातील नागरिकांनी मोकळा श्वास घेतला.
गेल्या दोन महिन्यापासून गायके मळ्यात अत्यंत भीतीचे आणि दहशतीचे वातावरण या बिबट्याने निर्माण केले होते. या बिबट्याने अनेकांवर हल्ले केल्याच्या घटना मागील काही दिवसात घडल्या होत्या. या बिबट्याला पकडण्यासाठी वन विभागाचे प्रयत्न सुरु होते.पण जाळ्यात सापडत नव्हता. काही दिवसांपासून धुमाकूळ घालणारा बिबट्या अखेर आज पिंजऱ्यात अडकला असून यामुळे नागरिकांनी मोकळा श्वास घेतला आहे. बिबट्या वनविभागाने लावलेल्या पिंजऱ्यात अडकल्याची माहिती वाऱ्यासारखी पसरल्यानंतर बघ्यांनी या ठिकाणी मोठी गर्दी केली होती. दरम्यान हा बिबट्या जेरबंद झाला असला तरी आणखी एक मादी व तिची पिल्ले या भागात आजही दिसत असल्याचे या परिसरातील नागरिकांनी सांगितले. त्यामुळे आता मादीला पकडण्यासाठी पिंजरा लावण्याची मागणी येथील नागरिकांनी केली आहे.