नागपूर- माजी मंत्री आणि राष्ट्रवादीचे आमदार नवाब मलिक आज हिवाळी अधिवेशनात आले आणि अजित पवार गटाच्या बाकांवर शेवटच्या रांगेत बसले. त्यानंतर विरोधी पक्षाच्या नेत्यांनी यावरून भाजपवर टीका केली. त्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी, नवाब मलिक महायुतीत नको, असे पत्र अजित पवारांना लिहिले. नागपूर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यापासून नवाब मलिक कोणत्या गटात असा प्रश्न सातत्याने उपस्थित झाला होता. यावर नवाब मलिक यांनीही मी खऱ्या राष्ट्रवादीसोबत असल्याचे सांगत संभ्रम कायम ठेवला. आज मलिक यांनी नागपूरमधील हिवाळी अधिवेशनाला हजेरी लावल्यावरदेखील हेच वाक्य कायम ठेवले होते. मात्र नवाब मलिक विधानसभेत सत्ताधारी बाकांवर बसले. तसेच अजित पवार गटाचे प्रतोद अनिल पाटील यांच्या कार्यालयात गेले. त्यामुळे ते आता अजित पवार गटाचे सदस्य झाल्याचे स्पष्ट झाले. त्यावरून विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी टीका केल्यावर संध्याकाळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नबाब मलिक यांना महायुतीमध्ये सामील करून घेण्यास विरोध केला. त्यांनी अजित पवार यांना पत्र लिहून स्पष्ट शब्दांत नाराजी व्यक्त केली आहे. त्यामुळे नबाब मलिक चांगलेच अडचणीत आले आहेत.
नवाब मलिक हे सध्या वैद्यकीय कारणामुळे जामिनावर आहेत. तुरुंगातून बाहेर आल्यापासून ते अलिप्त असल्याचे दिसत होते. मात्र, हिवाळी अधिवेशनाला हजर झाल्याने मलिक सक्रिय झाल्याचे म्हटले जात आहे.मलिक हे या अधिवेशनात चर्चांमध्येही भाग घेणार आहेत.
नवाब मलिकांबद्दल प्रश्न विचारताच अजित पवार म्हणाले, तुम्हाला काय करायचे आहे? ते आमदार आहेत. स्वतःचा निर्णय घ्यायला ते खंबीर आहेत. सभागृहात कुणी कुठे बसायचे या संदर्भातील अधिकार विधानसभा अध्यक्षांचा आहे. मधल्या काळात काय काय घटना घडल्या, ते तुम्हाला माहितीये. आज ते आलेत. माझा त्याच्याशी फोन झाला. मी त्यांना नागपुरात स्वागत म्हणून कॉल केला होता.
फडणवीसांनी यापूर्वी अनेकांना का घेतले?
देवेंद्र फडणवीस यांनी नवाब मलिक यांना महायुतीत सहभागी होण्यास विरोध केला असला तरी यापुर्वी सत्तेसाठी त्यांनी वेगवेगळे आरोप असलेल्या अनेक डागाळलेल्यांना महायुतीत घेतले आहे. 70 हजार कोटी रुपयांच्या भ्रष्टाचाराचा आरोप असलेल्या अजित पवारांचाही त्यात समावेश आहे. तेच देवेंद्र फडणवीस आता नवाब मलिकांना विरोध करत आहेत, ही आश्चर्याची गोष्ट आहे.