अयोध्या
अयोध्येत 22 जानेवारीला होणाऱ्या श्री रामाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात पूजा करण्याचा मान नवी मुंबईतील कांबळे दाम्पत्याला मिळाला आहे. देशातील 11 जोडप्यांना पूजा करण्याची संधी मिळाली आहे. त्यात कांबळे दाम्पत्याचा समावेश आहे. विठ्ठल कांबळे आणि उज्वला कांबळे अशी दाम्पत्याची नावे आहेत.
या दाम्पत्यांना 15 ते 22 जानेवारीपर्यंत वस्त्र परिधान ते जेवणापर्यंतच्या नियमांचे पालन करण्यास सांगितले होते. विठ्ठल कांबळे चेंबूर एज्युकेशन सोसायटीच्या प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक आहेत. रा. स्व. संघाचे स्वयंसेवक असलेले कांबळे 1992च्या कार सेवेत सहभागी झाले होते. विठ्ठल कांबळे यांनी सांगितले की,अयोध्येवरून राम मंदिर जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासचा निमंत्रणाचा फोन आला. श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी माझी निवड झाल्याचे सांगितले.माझा विश्वास देखील बसला नाही. मला एवढा आनंद झाला की, तो शब्दात सांगता येत नाही, 32 वर्षापूर्वीची सेवा आज फलद्रूपी पूर्ण झाली. वारकरी आई वडिलांचे सार्थक झाले. मी बाबरी मशिद पडताना पाहिली होती. गेल्या 32 वर्षांत पुन्हा अयोध्येला गेलो नाही. आता अयोध्येत भव्य राम मंदिर बघायला मिळेल. रामाच्या मूर्तीची प्राण प्रतिष्ठापना आमच्या उपस्थितीत होत आहे. हे आमचे परम भाग्य आहे. आम्ही स्वतःला भाग्यवान समजतो. हा क्षण आमच्या आयुष्यात येईल याची आम्ही कल्पना देखील केली नव्हती. आम्हाला या सोहळ्यात सहभागी होता येत असल्यामुळे अत्यानंद झाला आहे.