पुणे : केंद्रीय मंत्री तथा भाजप नेते नारायण राणे यांनी हिंदू धर्मासाठी शंकराचार्यांचे योगदान काय, असा प्रश्न विचारत, शंकराचार्यांनी प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला केलेल्या विरोधावरून टीका केली. राणेंच्या या विधानावरून काँग्रेस आक्रमक झाली असून काँग्रेसने आज राज्यभर ठिकठिकाणी आंदोलने केली. अयोध्येतील राम मंदिराचे बांधकाम अजून पूर्ण झालेले नाही. त्यामुळे, हिंदू धर्मातील सर्वोच्च धर्मगुरू समजल्या जाणार्या शंकराचार्यानी अर्धवट बांधकाम झालेल्या मंदिरात प्राणप्रतिष्ठा करणे चुकीचे असल्याचे सांगत रामलल्ला प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला जाणार नसल्याचे स्पष्ट केले. त्यावरुन, शंकराचार्यांचे हिंदू धर्मासाठी काय योगदान आहे, असा प्रश्न नारायण राणे यांनी उपस्थित केला. यामुळे राजकीय वाद रंगला. भाजपा आणि काँग्रेस या मुद्द्यावरूनआमने-सामने आले. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या आदेशानंतर आज काँग्रेसच्या वतीने राज्यभरात नारायण राणेंविरुद्ध आंदोलने करण्यात आली. छत्रपती संभाजी नगरच्या क्रांती चौका आणि पुण्यातील बालगंधर्व परिसरात काँग्रेसने राणेंच्या निषेधार्थ आंदोलन केले यावेळी मोठ्या संख्येने काँग्रेस कार्यकर्ते रस्त्यावर उतरले होते. ‘नारायण राणे यांनी शंकराचार्य व हिंदू धर्माचा अपमान केला आहे. शंकराचार्यांचे योगदान विचारणाऱ्या राणे यांचे तरी हिंदू धर्मासाठी काय योगदान आहे, असा प्रतिप्रश्न करत भाजपाने राणे यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केली. उद्धव ठाकरे यांनीही नारायण राणे यांच्यावर टीका करताना, शंकराचार्यावर बोलताना राणेंना लाज वाटत नाही का? असे म्हटले होते.