नाशिक
नाशिककरांवर सध्या पाणीटंचाईचे मोठे संकट आले आहे. पाणीटंचाईमुळे यंदा पहिल्यांदाच ७ तालुक्यांमध्ये १२० टँकरने पाणीपुरवठा करण्यात आला आहे. नाशिकमध्ये यंदा पाऊस कमी झाल्याने नागरिकांना हिवाळ्यामध्येच पाण्यासाठी टँकर मागवावे लागत आहेत. येवला तालुक्यामध्ये एकूण ४५ गावे आहेत, तर १५ वाड्या आहेत. येथे २३ टँकरने पाणीपुरवठा करण्यात आला आहे. नांदगावमध्ये एकूण ३७ गावे असून १६२ वाड्या आहेत. येथे या महिन्यात ३५ टँकर, बागलाण मधील एकूण १७ गावे आणि ५ वाड्या असून १५ टँकरने पाणीपुरवठा करण्यात आला आहे.
यासह इतर गावांमध्येही टँकरने पाणी पुरवठा करण्यात आला आहे. दरम्यान, नाशिक शहरामध्ये देखील पुढील महिन्यात पाणीटंचाई भासण्याची शक्यता वर्तवण्यात येते. पाणीकपात करण्याबाबत जलसंपदा विभागाने काही दिवसांपूर्वीच नाशिक महापालिकेला एक पत्र लिहिले आहे. नाशिक महापालिकेने गंगापूर धरणात चर खोदला नाही, तर २० टक्के पाणीकपात होईल, असे जलसंपदा विभागाने महापालिकेला दिलेल्या पत्रात म्हटले आहे. नाशिक शहरामध्ये तब्बल २० टक्के पाणी कपात केली जाईल, असेही या पत्रात नमूद केले आहे.