नाशिक – महायुतीमध्ये नाशिक लोकसभा मतदारसंघाचा पेच सुटण्याची चिन्हे दिसत नाहीत. नाशिकमध्ये शिंदेंच्या शिवसेनेचे हेमंत गोडसे आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे छगन भुजबळ उमेदवारीसाठी आग्रही आहेत. दोघेही उमेदवारी आपल्यालाच मिळेल असे छातीठोकपणे सांगत आहेत. त्यामुळे नाशिकचा तिढा सुटेनासा झाला आहे. त्यातच भाजपाचे नेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी आज गोंधळात भर टाकली. नाशकातला तिढा सुटला नाही तर तिसर्याच नव्या चेहर्याची चाचपणी सुरू आहे, असे विखे-पाटील यांनी सांगितले. त्यामुळे ना गोडसे, ना भुजबळ तिसराच कोणीतरी नाशकातून उमेदवारी पटकावेल का, असा सवाल उपस्थित केला जात आहे.
नाशिक लोकसभा मतदारसंघात शिंदे गटाकडून सुरुवातीपासून हेमंत गोडसे यांचे नाव चर्चेत आहे. मात्र अजित पवारांच्या आदेशानंतर छगन भुजबळ यांनी येथून निवडणूक लढविण्याची इच्छा व्यक्त केल्यापासून या मतदारसंघात उमेदवारीसाठी रस्सीखेच सुरू झाली आहे.
छगन भुजबळ म्हणाले की, दिल्लीतील भाजपाचे नेते नाशिकची जागा राष्ट्रवादीसाठी सोडायला तयार आहेत. तर शिंदे गटाचे हेमंत गोडसे म्हणाले की, नाशिकच्या जागेबाबतचा निर्णय वरिष्ठ पातळीवर घेतला जात आहे. येत्या दोन ते तीन दिवसात नाशिकच्या जागेची उमेदवारी जाहीर केली जाईल. ही जागा शिवसेनेलाच सुटणार आहे. भुजबळ आणि गोडसे यांच्यात रस्सीखेच सुरू असून, विखे-पाटलांनी जे संकेत दिले तो नवा चेहरा कोण असेल यावरही आता तर्कवितर्क लढविले जाऊ लागले आहेत.