नाशिक-मुंबई महामार्गावर अपघातात ४ जण ठार

नाशिक – नाशिक- मुंबई महामार्गावरील आडगावमध्ये मारुती ब्रिझा व आयशर ट्रकच्या समोरासमोरील धडकेत काल मध्यरात्री झालेल्या भीषण अपघातामध्ये मारुती कारमधील चार जणांचा जागीच मृत्यू झाला.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मुंबई-आग्रा महामार्गावरून नाशिककडून आडगावकडे एक आयशर ट्रक हा खत घेऊन जात होता. हा ट्रक १२ जुलैला रात्री ११ च्या सुमारास नाशिक आडगाव मुंबई महामार्गाने विरुद्ध दिशेने जात होता.वेगाने ट्रक चालवत असताना चालकाचा ट्रकवरील ताबा सुटला. ट्रक दुभाजक तोडून थेट विरुद्ध बाजूच्या नाशिक मार्गिकेवर जाऊन समोरून येणाऱ्या ब्रिझा कारवर धडकला. या भीषण अपघातात कारमधील चार जण जागीच ठार झाले. तर ट्रक चालक व क्लीनर जखमी झाले आहेत. रहेमान सुलेमान तांबोळी (वय ४८), त्यांचा भाचा अरबाज चांदुभाई तांबोळी (वय २१, दोघे. रा.लेखनगर सिडको), सीज्जू पठाण (वय ३८, रा.इंदिरानगर), अक्षय जाधव (वय २४,रा. श्रध्दा विहार, इंदिरानगर) अशी मृतांची नावे आहेत.