नवी दिल्ली- संपूर्ण उत्तर भारतात कडाक्याची थंडी आहे. बहुतांश भाग दाट धुक्याच्या विळख्यात आहेत. थंडीची लाट आणि दाट धुक्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.याचा परिणाम मुलांच्या शिक्षणावरही झाला आहे. त्यामुळे दिल्लीला लागून असलेल्या नोएडा आणि ग्रेटर नोएडामध्ये नर्सरीपासून आठवीपर्यंतच्या शाळा काल शनिवारपासून १४ जानेवारीपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश गौतम बुद्ध नगर जिल्हा प्रशासनाने दिले आहेत.
गौतम बुद्ध नगर जिल्हा दंडाधिकारी मनीष कुमार वर्मा यांच्या आदेशानंतर सर्व बोर्डाच्या शाळांमध्ये नर्सरी ते आठवीपर्यंतचे वर्ग १४ जानेवारीपर्यंत चालणार नाहीत.हा आदेश सीबीएसई,
आयसीएसई,आयबी, युपी बोर्ड आणि इतरांशी संलग्न असलेल्या सर्व शाळांना लागू असेल.या आदेशाचे काटेकोर पालन करण्यास जिल्हा पायाभूत शिक्षणाधिकारी राहुल पनवार यांनी सांगितले आहे. तसेच इयत्ता नववी आणि बारावीच्या वर्गांच्या वेळेत बदल करण्यात आला आहे. या वर्गाच्या शाळा सकाळी १० ते दुपारी ३ वाजेपर्यंत चालतील.राज्यातील ४० हून अधिक जिल्ह्यांमध्ये दाट धुके आणि थंडीची लाट पसरली आहे.याबाबत हवामान खात्याने अलर्ट जारी केला आहे. सकाळी धुक्यामुळे नागरिकांना घराबाहेर पडणे कठीण झाले आहे.बर्फाच्छादित वाऱ्यांमुळे गोठवणारी थंडी आहे.