पंतप्रधान उपवास व कठोर नियम पाळणार! राम मंदिरासाठी मोदींचे 11 दिवस अनुष्ठान

नाशिक- अयोध्येतील राम मंदिर सोहळ्यानिमित्त पंतप्रधान मोदी यांनी आजपासून 11 दिवसांचे अनुष्ठान ठेवले आहे. विशेष म्हणजे, आज नाशिकच्या काळाराम मंदिरात पूजा केल्यानंतर या अनुष्ठानाला सुरुवात केली. हे 11 दिवस मोदी हिंदू शास्त्रानुसार उपवास करणार आहेत व कठोर नियमांचे पालन करणार आहेत. नाशिकच्या दंडकारण्यात काळाराम मंदिरात दर्शन घेऊन गोदावरी नदीचे पूजन करून या अनुष्ठानाची सुरुवात केली आहे.
पंतप्रधान मोदींनी एक्सवर पोस्ट केलेल्या ऑडिओ संदेशाची सुरुवात ‘सियावर रामचंद्र की जय’ असे म्हणत केली. त्यात त्यांनी म्हटले की, ‘मी सध्या एका वेगळ्या प्रकारची भक्ती अनुभवत आहे. माझ्या अंतरात्म्याचा हा भावनिक प्रवास एक उत्तम अनुभव आहे. याची खोली, रुंदी आणि तीव्रता मी शब्दांत मांडू शकत नाही. तुम्ही माझी परिस्थिती समजू शकता. जे स्वप्न अनेक पिढ्यांच्या हृदयात वर्षानुवर्षे एका संकल्पाप्रमाणे राहिले, ते स्वप्न पूर्ण होत असताना मला उपस्थित राहण्याचे सौभाग्य मिळाले आहे. प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या वेळी भारतातील सर्व नागरिकांचे प्रतिनिधित्व करण्याचे मी एक केवळ साधन आहे. ही खूप मोठी जबाबदारी आहे. आपल्या धर्मग्रंथात सांगितल्याप्रमाणे भगवंताच्या यज्ञ आणि उपासनेसाठी आपल्याला स्वतःमध्येही परमात्माभाव जागृत करावा लागतो. यासाठी धर्मग्रंथात उपवास आणि कठोर नियम सांगितले आहेत, ज्यांचे पालन करण्यापूर्वी अभिषेक करावा लागतो. मला काही तपस्वी आणि आध्यात्मिक महापुरुषांकडून मिळालेले मार्गदर्शन आणि त्यांनी सांगितलेल्या नियमांनुसार मी आजपासून 11 दिवसांचे विशेष अनुष्ठान सुरू करत आहे. या पवित्र प्रसंगी मी देवाच्या चरणी प्रार्थना करतो आणि जनतेला विनंती करतो की, तुम्ही मला आशीर्वाद द्या.’
मोदींनी असेही म्हटले की, ‘माझ्या देशबांधवांनो, तुम्हा सर्वांना राम-राम. जीवनातील काही काल्पनिक क्षण दैवी आशिर्वादामुळेच वास्तवात बदलतात.
आजचा दिवस आपल्या सर्व भारतीयांसाठी आणि जगभरातील राम भक्तांसाठी एक पवित्र पर्व आहे. सर्वत्र भगवान श्री राम भक्तीचे अद्भुत वातावरण आहे. चारही दिशांना राम नामाचा जयघोष सुरू आहे. प्रत्येक देशवासी 22 जानेवारीच्या ऐतिहासिक अशा पवित्र क्षणाची वाट पाहत आहे. अयोध्येतील रामललाच्या प्राणप्रतिष्ठासाठी आता फक्त 11 दिवस उरले आहेत. या शुभ सोहळ्याचे साक्षीदार होण्याची संधी मलाही मिळत आहे, हे माझे भाग्य आहे. माझ्यासाठी हा अकल्पनीय अनुभवांचा काळ आहे. याक्षणी मी अत्यंत भावूक झालो आहे. मी माझ्या आयुष्यात पहिल्यांदाच अशा भावनांमधून जात आहे.’
पंतप्रधान मोदींनी व्हिडिओसह ‘एक्स’वर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, ‘अयोध्येतील रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला फक्त 11 दिवस बाकी आहेत. या शुभ सोहळ्याचा मीदेखील साक्षीदार होणार आहे, हे माझे भाग्य आहे. प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या वेळी भारतातील सर्व नागरिकांचे प्रतिनिधित्व करण्यासाठी परमेश्वराने मला एक साधन बनवले आहे. मी आजपासून 11 दिवसांचे विशेष अनुष्ठान सुरू करत आहे. यासाठी मी सर्व जनतेकडून आशीर्वाद मागतो. याक्षणी माझ्या भावना शब्दात मांडणे खूप अवघड आहे. पण या भावना शब्दांत मांडण्याचा मी प्रयत्न केला आहे.’
काळाराम मंदिरात साफसफाई
आजच्या नाशिक दौऱ्याच्या सुरुवातीला मोदींनी रोड शो केला. त्यानंतर रामकुंडावर पोहोचले. तिथे त्यांनी गोदावरीचे जलपूजन केले. त्यानंतर ते ऐतिहासिक काळाराम मंदिरात दाखल झाले. यावेळी पुजाऱ्यांनी मानचिन्ह देऊन त्यांचे स्वागत केले. नरेंद्र मोदींनी काळाराम मंदिराची पाहणी देखील केली आणि त्यांनी काळारामाची आरती आणि पूजाही केली. त्यासोबत त्यांनी मंदिरात सुरू असलेल्या भजनात सहभाग घेतला. त्यांनी या मंदिर परिसरात स्वामी विवेकानंद यांच्या पुतळ्याला पुष्प अर्पण केले आणि या मंदिरात हाती झाडू घेऊन स्वच्छता मोहीम राबवली. नंतर आपल्या भाषणात मोदी म्हणाले, 14 जानेवारीपासून 22 जानेवारीपर्यंत प्रत्येक मंदिरात साफसफाई करा. स्वच्छता अभियान राबवा. श्रमदान करा. माझा असा आग्रह आहे. आज मला काळाराम मंदिरात साफसफाई करता आली, हे माझे सौभाग्य आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top